ball

वेध टेस्ट चॅम्पियनशीपचे

by कौस्तुभ चाटे

काही वर्षांपूर्वी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात केली. हा एक प्रयॊग असला तरीदेखील क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता.एकीकडे टी२० क्रिकेट फैलावत असताना क्रिकेटचा प्रमुख फॉरमॅट कसोटी क्रिकेट मात्र कुठेतरी कमी पडतंय अशी सर्वत्र भावना होती. ९० च्या दशकात जेंव्हा एकदिवसीय क्रिकेट जोरात होतं आणि सर्वत्र त्या फॉरमॅटची चर्चा असे, तेंव्हा कसोटी क्रिकेट आता लवकरच संपणार आहे असं बोललं जात असे. त्यानंतर काही वर्षांनी टी२० सामने सुरु झाले. त्याचबरोबर इतर काही फॉरमॅट्सचा (उदा. टी१० आणि हंड्रेड) जन्म झाला, पण टेस्ट क्रिकेट अजूनही तसेच आहे. हो, अनेकदा सामना ड्रॉ करण्याकडे संघांचा कल असायचा, त्यामुळे अनेकदा कसोटी सामने बोरिंग व्हायचे. ५-५ दिवस चालणारे सामने प्रेक्षकांना नको असायचे, त्या क्रिकेटमध्ये हाणामारी नसायची, पॉवर प्ले च्या ओव्हर्स नसायच्या… प्रेक्षकांनी कसोटी सामन्यांकडे जणू पाठ फिरवली होती. अर्थात, त्याला पूर्णपणे कसोटी क्रिकेट जबाबदार होतं असंही म्हणता येणार नाही. एकूणच प्रेक्षकांचा कसोटी क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला होता. अशा वेळी कसोटी क्रिकेट वाचवणं आवश्यक होतं कारण आजही अनेक प्रेक्षक कसोटी क्रिकेटलाच महत्व देतात. त्यांच्यासाठी तेच खरं क्रिकेट आहे. इतकंच काय, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक क्रिकेटपटू देखील कसोटी क्रिकेटलाच प्राधान्य देतात. कसोटी किंवा टेस्ट क्रिकेट हे एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आहे, आणि त्याचं महत्व इतर दोन्ही फॉरमॅट्सपेक्षा जास्त आहे असं जाणकार समीक्षक नेहमी सांगतील. ह्याच क्रिकेटला थोडंफार बदलायचा प्रयत्न टेस्ट चॅम्पियनशीप ह्या स्पर्धेने केला. 

अनेकदा अनेक लोक विचारतात की खरंच ह्या चॅम्पियनशीप ची गरज आहे का? कसोटी क्रिकेट टिकवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? आजच्या टी२० च्या प्रेक्षकाला तीन तासातली ती बॅटिंग आणि बॉलिंग बघायची असते. त्याला संपूर्ण दिवस सामना बघण्याची इच्छा देखील नाही. पण टी२० क्रिकेटमध्ये आपण जे बघतो त्याला क्रिकेट म्हणता येईल का? खेळाडूंच्या स्किल्सना पुरेपूर संधी ह्या क्रिकेटमध्ये मिळते का? आडवेतिडवे फटके मारून धावा करणे ह्याने प्रेक्षकांचे समाधान होत असेल पण खेळाडूची भूक नाही ना भागत. आपण बाहेर कितीही दिवस बर्गर आणि पिझ्झा खाल्ला तरीदेखील घरी येऊन भाजी भाकरी मध्येच आपल्याला जास्त आनंद मिळतो ना. कसोटी क्रिकेट हे त्याचा समाधानाची, आनंदाची अनुभूती देणारं क्रिकेट आहे. आणि खरं क्रिकेट हवं असेल तर कसोटी क्रिकेट टिकावं आणि जगावं म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रिकेट इतर अनेक देशात पोहोचवणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे ते म्हणजे कसोटी क्रिकेट टिकवणं. आणि तोच प्रयत्न आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून करताना दिसतात. ह्यावर्षी – २०२३ मध्ये आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. हा ह्या चॅम्पियनशीपचा दुसरा सिझन असेल. आजही ह्या स्पर्धेत काही त्रुटी आहेत हे नक्की, पण अशी स्पर्धा घडणे आणि वाढणे हे क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटसाठी ज्या प्रकारे विश्वचषक स्पर्धा होते, त्याच प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये स्पर्धा होऊन त्यातील विजेत्याला मिळणारे बक्षीस म्हणजे ही टेस्ट चॅम्पियनशीपची गदा.    

टेस्ट चॅम्पियनशीप २ वर्षांची आहे. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या संघांमध्ये ह्या दोन वर्षांच्या कालावधीत काही कसोटी सामने खेळवले जाऊन, काही वेगळ्या पद्धतीने त्याची मोजणी (पॉईंट्स सिस्टीम) करून मगच पुढे चॅम्पियनशीप साठीचे संघ ठरवले जातात आणि त्या दोन संघात अंतिम सामना खेळवला जातो. २०२१ साली झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि भारत हे डोंग एकमेकांशी भिडले, आणि त्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. हा सामना इंग्लंडमध्ये खेळवला गेला. एका त्रयस्थ देशात झालेला हा अंतिम सामना (केवळ भारत खेळत होता म्हणून) अनेक प्रेक्षकांनी बघितला. ह्या सामन्यावर देखील टीका करण्यात आली. मुळात हा सामना त्रयस्थ देशात खेळवायला हवा होता का? कदाचित एक अंतिम सामना न ठेवता, तीन किंवा पाच सामन्यांची मालिका खेळवली गेली असती तर? भारत ह्या सामन्यात खेळत नसता तर त्याला मिळालं तितकं महत्व मिळालं असतं का असे अनेक प्रश्न विचारले गेले. कदाचित क्रिकेटच्या ह्या बिझी शेड्यूल मध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवता आली नसती, पण सामना कुठे खेळवायला हवा ह्याचा निर्णय दोन अंतिम संघांवर सोडता आला असता तर? आणि त्रयस्थ देशच हवा तर मग भारतीय उपखंडातील एखाद्या देशात किंवा वेस्ट इंडिज मध्ये हा सामना का खेळवला गेला नाही? असेही प्रतिप्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न ह्यासाठी महत्वाचे आहेत की ह्यावर्षी होणारा अंतिम सामना देखील असाच त्रयस्थ भूमीवर खेळवला जाईल. आयसीसीने खूप आधीच ह्या अंतिम सामन्याची जागा निवडली आहे. हा सामना २०२३ च्या जून-जुलै मध्ये इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. (जिथे पहिल्या स्पर्धेचा देखील अंतिम सामना खेळवला गेला होता.) आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंड अपात्र ठरला आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणजे पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागणार आहे. 

ह्या वर्षी होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील दोन प्रमुख दावेदार आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि भारत. इतर दोन संघांना – दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका, ह्या अंतिम सामन्यात खेळण्याची अतिशय कमी का होईना पण संधी आहे. तरीदेखील आजच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि भारताचे पारडे अंमळ जड आहे हे नक्की. ऑस्ट्रेलियाचे ह्या स्पर्धेसाठी ५ कसोटी सामने शिल्लक आहेत आणि भारताचे ४. पण महत्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या २ महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन संघात ४ कसोटीची मालिका खेळवली जाणार आहे, ती देखील भारतात. ऑस्ट्रेलियाचे ह्या अंतिम सामन्यात खेळणे जवळ जवळ नक्की आहे, पण भारतासाठी ही चार कसोटीची मालिका अतिशय महत्वाची आहे. भारताने ही मालिका दोन कसोटीच्या अथवा त्यापेक्षा चांगल्या फरकाने जिंकली तर भारत देखील अंतिम सामन्यात खेळू शकेल. ही मालिका घराच्या मैदानावर खेळवली जात असल्याने भारतीय संघाला ही मालिका जिंकणे जड जाऊ नये. भारतीय संघाला घरच्या मैदानावर हरवणे तसे अवघडच आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आपण इंग्लंडवर मात करूनच टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. 

आजच्या घडीला आपला संघ एका संक्रमणातून जात आहे. खराब फॉर्म, दुखापतग्रस्त खेळाडू, चुकीची संघनिवड, कॅप्टनसीचे गोंधळ अश्या सगळ्या वातावरणात आपण अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो आहोत हीच मोठी गोष्ट आहे. त्यात पुढील मालिका (ऑस्ट्रेलिया विरुद्धची) फिरकी खेळपट्टीवर खेळणे आणि नंतर इंग्लंडमध्ये विपरीत वातावरणात आणि खेळपट्टीवर अंतिम सामना खेळणे भारतीय संघासाठी आव्हान असेल. त्यात समोर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल ते तर वेगळेच. जून जुलै महिन्यातील इंग्लंडमधील वातावरण आपल्यापेक्षा ऑस्ट्रेलियासाठी जास्त अनुकूल असेल. अश्यावेळी भारतीय खेळाडू ह्या आव्हानांचा कसा मुकाबला करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारतीय संघाने आयसीसीच्या बहुतेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे  आपल्या संघाने टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतही चांगली कामगिरी करून विजेतेपद मिळवावे अशीच भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल. ही चांगली कामगिरी (आणि विजेतेपद) भारतीय क्रिकेटला देखील एका नव्या ऊंचीवर घेऊन जाईल ह्यात शंका नाही. 

To know more about Crickatha