ball

Readers’ Articles

by स्वप्नील घुमटकर

आई वडिलांनंतर कोणाच्या पहिल्यांदा प्रेमात पडलो असेल तर क्रिकेटच्या..आताची पोर पोरींवरून मार खातील,छपरीगिरीवरून मार खातील पण आपण क्रिकेट वरून भरपुर मार खाल्लाय..पण तरीही परत क्रिकेट परत मार चालुच राहिला..पण क्रिकेट खेळायच काय कमी झाल नाही..अन क्रिकेटमध्ये बॅटिंग, बाॅलिंग पेक्षा फिल्डींग आपल्याला जास्त आवडायची..

अन त्यावेळेस भारतीय संघात युवी-कैफचा क्षेत्ररक्षणात मोकार बोलबाला..त्यामुळे माझ्या हे दोघ खास आवडीचे..अन आजच्याच दिवशी 13 जुलै 2002 ला लाॅड्स च्या मैदानावर या दोघांनी भारताला न भुतो न भविष्यती विजय मिळवून दिला.. इंग्लंड मध्ये भारत विजयी झालेल्या नॅटवेस्ट सिरीज अगोदर इंग्लंड संघ भारतामध्ये सहा एकदिवसीय सामन्यांची सिरीज खेळायला आला होता..एक सामना रद्द झाल्यामुळे भारत इंग्लंड दोन दोन विजयांनी बरोबरीत होते.सहावा सामना सिरीजचा विजेता ठरवला जाणारा होता..वानखडे स्टेडियम मध्ये झालेल्या सामन्यात भारताला 255 धावांच लक्ष्य इंग्लंड ने दिले होते..शेवटच्या षटकात भारताला सहा धावा लागत होत्या तर दोन गडी शिल्लक होते..फ्लिन्टॉफ ने टाकलेल्या षटकात दोन्ही गडी बाद करत इंग्लंड चा विजय साकार केला..आणि मैदानावर जल्लोष करत असताना टिशर्ट काढून राडा घातला..त्या पराभवापेक्षा ही सल भारतीयांच्या मनात जास्त कोरली गेली..तिचा वचपा काढण्याची संधी भारताला लवकरच मिळाली..

अजुनही तो सामना भारतीय पाठिराखे विसरले नसतील..मला आठवतय आमच्याकडे tv नव्हता..शेजारी मॅच पाहायला जायचो..अन त्यात वनडे म्हणल्यावर संपुर्ण दिवस दुसर्‍याच्या घरी सामना बघणे म्हणजे विषय अवघडच..मग एक कोणत्या तरी संघाचा डाव बघायचा..

त्या अंतिम सामन्यात ट्रेस्कोथिक आणि नासिर हुसेन च्या शतकाच्या जोरावर इंग्लंड ने 325 धावांचा डोंगर भारतापुढे उभा केला..त्यावेळेस 260-270 धावांच लक्ष्य सुद्धा अवघड वाटायच..अन इथ तर 300 धावा पार करून 325 धावा इंग्लंड च्या झाल्या होत्या.. 326 धावांच लक्ष्य घेऊन सेहवाग आणि गांगुली मैदानावर उतरले..आणि या दोघांच्या मनात या लक्ष्याचा किंचितसाही दबाव नव्हता या अविर्भावात दोघं खेळु लागले..इंग्लंड गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत होते.गांगुली बाद झाला तेव्हा संघाच्या पंधराव्या षटकात 105 धावा होत्या..सलामवीरांनी त्यांच काम केल होत.आता मधल्या फळीने ती जबाबदारी उचलायची होती..पण गांगुली अन सेहवाग लागोपाठच्या षटकात बाद झाले आणि भारताचा डाव अक्षरश गडबडला..बिनबाद 100 वरून 5 गडींच्या मोबदल्यात 146 धावा स्कोअर बोर्डवर लागल्या..गांगुली,सेहवाग, द्रविड, सचिन हे भारताचे हुकमी फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परतले होते..अन मैदानावर होती आपल्या आवडीची जोडी कैफ आणि युवराज..दोघांच्या मनात भारताला विजयी करून नावाजलेल्या फलंदाजांमध्ये आपल्याही नावाचा डंका वाजवायची इच्छाशक्ती होती तर ज्यांच्या घरी सामना बघायला गेलो होतो त्यांची भारत हरणार म्हणून चॅनल बदलायची लगबग होती. त्यांना म्हणल फक्त पाच सहा ओव्हर बघु ,एखादा झटका भारताला लागला तर बदला चॅनेल..मीही माझ्या घरी जाईल.. पण इकड सामन्यात दोघांच्या मनात एक वेगळाच मनसुबा मनी होता…पाच बाद 146 वरून दोघांनी भारताचा डाव सावरलाच वर 121 धावांची भागिदारी करत विजयाची अपेक्षाही निर्माण केली..युवराज सिंग (69 धावा) बाद झाला तेव्हा भारताने फलकावर 267 धावा लावल्या होत्या..युवराज बाद झाल्यावर कैफने हरभजनसिंग ला सोबत घेत भारताची धावसंख्या 300 पार नेली..314 धावसंख्या फलकावर असताना 48 व्या षटकात भज्जी बाद झाला.अन लगेच कुंबुळेही पॅव्हेलियन मध्ये परतला .. बारा चेंडूत अकरा धावा लागत असताना कैफ च्या जोडीला जहीर खान मैदानावर होता..तर इंग्लंड ला विजयासाठी दोन विकेट्सची गरज होती..

एकोणपन्नासावे षटक इंग्लंड चा अनुभवी गोलंदाज डॅरेन गाॅफ घेऊन आला होता तर समोर जहिर खान स्ट्राईक ला होता.पहिल्याच चेंडूवर एक धाव घेऊन कैफ स्ट्राईक वर आला..अन नंतरच्या पाच चेंडूवर आठ धावा घेत दोघांनी त्या षटकात नऊ धावा वसूल करत शेवटच्या षटकात विजयासाठी दोनच धावा शिल्लक ठेवल्या..


शेवटच षटक घेऊन होता..फ्लिन्टॉफ..तोच फ्लिन्टॉफ ज्याने तीन चार महिन्यांपूर्वी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात सहा धावा लागत असताना भारताचे शेवटचे दोन्ही फलंदाज बाद करून पुर्ण मैदानावर शर्ट काढुन राडा घातला होता.. सहा चेंडूत भारताला विजयासाठी दोन धावा..स्ट्राईक ला जहीर खान ..पहिले दोन्ही चेंडू फ्लिन्टॉफ ने डाॅट टाकले होते..तिसरा चेंडू जहीरच्या बॅट ला लागला अन कैफ अन जहीर दोघेही धावेसाठी पळाले ..धावचीत करण्याच्या नादात इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकाकडुन ओव्हर थ्रो झाला..अन दोघांनीही दोन धावा पुर्ण करत भारताला अविश्वसनीय विजय साकार करून दिला होता..या विजयात कैफच्या नाबाद 87 धावा महत्त्वपूर्ण होत्या..

शेवटच्या दोन धावा पुर्ण झाल्यावर भारतीय संघ, पाठिराखे खुशीत होते..पण लाॅड्स च्या गॅलरीत दादा वेगळ्याच मुडमध्ये होता..वानखडेची सल दादाच्या मनावर कोरली गेली होती..आणि दादाने त्याचा वचपा लाॅड्स च्या गॅलरीत अखेर काढलाच..शर्ट काढुन फ्लिन्टॉफ ला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होते.. आणि आजही एकोणीस वर्ष झाल तरी लाॅड्स वरचा भारताचा हा विजय आणि दादाने लाॅड्स च्या गॅलरीत घातलेला राडा भारतीय चाहत्यांच्या काळजात यादगार क्षण म्हणून कैद झालाय…

To know more about Crickatha