ball

महिला क्रिकेट – काल आणि आज 

by Shubhangi Kulkarni

मला काही दिवसांपूर्वी विचारण्यात आले होते की जेव्हा मी ४५ वर्षांपूर्वी खेळत होते, त्याऐवजी सध्याच्या काळात क्रिकेट खेळणे मला अधिक आनंददायक वाटले असते का? माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘हो’. महिला क्रिकेट सध्या छान सुरू आहे, आणि अजूनही पुढे जाणार आहे. पण मग मी विचार केला, एक मिनिट, माझे खेळाचे दिवस सर्वोत्तम होतेच पण या प्रश्नामुळे मला त्या काळातील आणि ह्या काळातील खेळाबद्दल सखोल विचार करायला लावला.

आज, महिला क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि जगभरात हा खेळ वाढत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता महिला क्रिकेटचा समावेश झाला आहे. मागच्या आशियाई खेळांमध्ये पण क्रिकेटचा समावेश होता. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याबद्दल चर्चा सुरू आहेत आणि आयसीसी याबद्दल खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की खेळाडू अपेक्षेने वाट पाहत आहेत की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले जाईल कारण जागतिक पातळीवर ऑलिम्पिक हे खेळांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ मानले जाते.

गेल्या पाच वर्षांमध्ये महिला क्रिकेटचा झपाट्याने विकास झाला आहे. २०१७ साली प्रेक्षकांनी भरलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेलेला महिला विश्वचषकाचा अंतिम सामना अभूतपूर्व होता. असा अनुभव आधी कधी आला नव्हता. इंग्लंड आणि भारताने अंतिम फेरी गाठली. फक्त अंतिम सामन्यातच नव्हे तर या संपूर्ण प्रवासामध्ये भारतीय संघाकडे सगळ्यांचे लक्ष होते. सोशल मीडियामुळे महिला क्रिकेटपटू घराघरात पोहोचल्या होत्या. पुरुष क्रिकेटपटूंनीदेखील महिला संघाच्या खेळाला प्रोत्साहन दिले, त्यांच्या कामगिरीवर भाष्य आणि कौतुक करून खेळाच्या कक्षा विस्तारल्या. 

महिला क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगले आहे. जेव्हा क्रिकेट हा पुरुषांचा खेळ समाजाला जायचा तेव्हा आम्ही महिला क्रिकेटच्या पायोनियर होतो. दिवसभर उन्हात उभे राहून खेळणे आणि लेदर चेंडूने खेळणे हे पुरुषांचे काम समजले जायचे. त्या वेळी आम्हाला क्वचितच कोणी प्रायोजक होते. आम्ही ज्या क्लब आणि कॉलेजच्या मैदानावर खेळायचो, ती मैदानेदेखील चांगल्या दर्जाची नव्हती. आम्ही रेल्वेच्या सेकंड क्लासनी प्रवास करायचो आणि तोदेखील बऱ्याचदा आरक्षणाशिवाय. आम्ही वसतिगृहांमध्ये राहिलो. संपूर्ण संघ एकाच खोलीत राहायचा आणि कॉमन टॉयलेट्स वापरायचा. आमच्या खेळण्याच्या दिवसात जेव्हा आम्ही परदेशी जात असू, तेव्हा बहुतेक वेळा आमचा प्रवास इकॉनॉमी क्लासने होत असे, अनेकदा आम्ही युथ होस्टेल्स आणि डॉर्मेटरीमध्ये राहिलो आहोत. सध्याच्या खेळाडूंसाठी हे सर्व बदलले आहे. आता महिला खेळाडू चांगल्या मैदानावर खेळतात. त्रितारांकित किंवा पंचतारांकित (3 Star-5 Star) हॉटेलमध्ये राहतात. त्यांना जेवणासाठी भत्ता मिळतो, बहुतेक सगळीकडे बिझनेस क्लासने प्रवास होतो. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे आता मुख्य प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, मॅनेजर, गोलंदाजी प्रशिक्षक, व्हिडिओ विश्लेषक, फिजिओ असे सगळे मदतीला आहेत. याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्या संघाच्या कामगिरीचेच नव्हे तर दुसऱ्या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करून संघाचे धोरण ठरवता येते. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचे विश्लेषण करून खेळ उंचावण्यास मदत होते. 

तसेच T20 क्रिकेटच्या आगमनामुळे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळले जाते. बहुतेक सामन्यांचे टीव्ही प्रक्षेपण होत असल्यामुळे खेळाडूंना खूप काही शिकायला मिळते. आमच्या काळात अशा गोष्टी कधी कळत नव्हत्या. आमच्या काळातील खेळाडू आता त्या वेळेचे फोटो शोधण्याचा प्रयत्न करतात. सामन्याचे व्हिडीओ सापडणे तर दूरची गोष्ट. सर्वात मोठी गोष्ट आहे की जसे इतर देशांमधील खेळाडूंना करारबद्ध केले जाते तसे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय महिला खेळाडूंना करारबद्ध केले आहे. जरी कराराची रक्कम पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी असली तरी खेळाडू आता खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात. खेळाडू स्वतःसाठी फिटनेस प्रशिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक नेमून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा क्रिकेटला फायदा होतो. सध्याच्या संघाची फिटनेस पातळी अधिक चांगली दिसते. चांगल्या मैदानावर खेळल्यामुळे आणि फिटनेस पातळी उंचावल्याचे परिणाम खेळात दिसत आहेत. महिला T20 सामन्यांमुळे आणि पुरुषच्या IPL मुळे भारतीय महिला खेळाडूदेखील महिला IPL ची वाट पाहत आहेत.

सगळा विचार केल्यावर असं वाटतं की महिला क्रिकेट खेळण्यासाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे. पण हे म्हणूनही आम्ही मैदानावर घालवलेल्या वेळाबद्दल मला खेद नक्की नाही. कारण माझ्या पिढीतील खेळाडू फक्त भारतातील खेळाचे प्रणेते नव्हते पण आज महिला क्रिकेट कुठे आहे याचा प्रत्यक्षात पाया आम्ही रचला. ते रोमांचक क्षण होते. हा पाया नक्कीच भक्कम होता अन्यथा खेळ आतापर्यंत टिकला नसता. माझ्या काळात महिलांनी चांगली कामगिरी केली नसती तर लोकांची आत्ताच्या खेळाबद्दल तेवढी आत्मीयता राहिली नसती. माझ्या वेळी भारतात अनेक दिग्गज खेळाडू होत्या. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, सुधा शाह, नीलिमा बर्वे – जोगळेकर, उज्ज्वला निकम – पवार, कल्पना परोपकारी – तापीकर ह्या आणि अशा अनेक खेळाडूंमुळे भारतातील महिला क्रिकेट अधिक परिपक्व झालं. ह्या सर्वांनीच चांगला खेळ केला नसता तर कदाचित आज इतक्या वर्षांनीसुद्धा महिला क्रिकेटला ज्या प्रकारे समर्थन मिळत आहे, ते कदाचित मिळालं नसतं. ह्या सर्वच खेळाडू कौशल्य आणि तंत्राच्या बाबतीत कुठेच कमी नव्हत्या. परदेशी दौऱ्यांवरदेखील त्यांनी कायमच चांगली कामगिरी केली.

तसेच, मी खेळलेल्या दिवसांची मला कदर आहे कारण आम्हाला कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मजेत खेळलो, आम्ही मित्र बनवण्याचा, एकमेकांना पाठिंबा देण्याचा आणि जे काही आहे त्याचा आनंद घेण्याचा मनापासून प्रयत्न केला. मला वाटतं तो एक अप्रतिम काळ होता. आम्हाला क्रिकेट खेळणे आणि आयोजित करणे आवडत होते. आमच्या घरांपासून काही दिवस लांब राहणे आणि एकत्र राहणे मजेदार होते. आम्ही तेव्हा नवीन होतो आणि प्रत्येकाबरोबर थट्टामस्करी करायचो. पण मैदानावर आम्ही तीव्र प्रतिस्पर्धी होतो. आमची त्या वेळेपासून झालेली मैत्री अजून आहे. फक्त भारतात नाही तर जगभरातील खेळाडूंशी मैत्री आहे. हा सर्व अनुभव आणि ते दिवस मी आयुष्यभर आठवणीत राहतील. 

महिला क्रिकेट हे आता एक वेगळं करिअर होऊ घातलं आहे. तुम्ही जर भारतासाठी खेळत असाल, तर तुम्हाला प्रायोजक मिळतील, जाहिरातीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ह्यामध्ये मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी हेसुद्धा तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवतील. पण जरी तुम्ही अगदी भारतासाठी नाही खेळू शकलात, तरीदेखील इतर अनेक गोष्टींमध्ये तुम्ही तुमची कारकीर्द घडवू शकता. तुम्ही क्रिकेट समालोचन, क्रिकेट स्तंभलेखन करू शकता. प्रशिक्षक, क्रिकेट प्रशासक (administrator) बनू शकता. फिजिओ, ट्रेनर आणि अशा असंख्य संधी आजच्या मुलींना उपलब्ध आहेत. आणि कदाचित त्यामुळेच अनेक पालक आज मुलींना क्रीडा क्षेत्राकडे किंवा  प्रामुख्याने  क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे जर आज कोणी विचारले की आजच्या काळात मला क्रिकेट खेळायला आवडलं असतं का, तर माझं उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. पण मला अजून भर घालून सांगावेसे वाटेल की माझ्या काळात खेळलेलं क्रिकेट माझ्यासाठी जास्त जवळचं आहे, जास्त आनंद देणारं आहे.  

To know more about Crickatha