ball

दौरा आयर्लंडचा 

by कौस्तुभ चाटे

आपला क्रिकेट संघ अक्षरशः कोलूला जुंपल्यासारखा क्रिकेट खेळतो. वेस्टइंडीजचा दौरा आटोपला की आता ३ टी-२० सामने खेळण्यासाठी आपण आयर्लंडला जाऊ. १८-२० आणि २३ ऑगस्ट रोजी हे तीन सामने संपले की लगेचच श्रीलंकेत आशिया चषक, नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका, ते झालं की आशियाई खेळ आहेतच, आणि पाठोपाठ येणारी विश्वचषक स्पर्धा. एकूणच पुढचे ३ महिने आपल्याकडे नॉन स्टॉप क्रिकेट असेल. आता आपण २ वेगवेगळे संघ २ ठिकाणी पाठवू शकतो आहोत ते बरं आहे, अन्यथा सगळेच खेळाडू पायाला चक्री लावल्यासारखे सगळीकडे गेले असते. हा आयर्लंडचा दौरा तास छोटा असला तरी आपल्या काही खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. अजूनही आपली विश्वचषकासाठी म्हणावी तशी तयारी झाली नाहीये. त्यात या अशा दौऱ्यांनी काय साध्य होणार आहे हेच शोधायचा प्रयत्न करूया. 


या दौऱ्याच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपला ‘दुसरा’ संघ जाणार आहे असे म्हणता येईल. म्हणजे जे खेळाडू विश्वचषक स्पर्धेत ‘नसण्याची’ शक्यता आहे अशा खेळाडूंची इथे निवड केली गेली आहे. अर्थात काही अपवाद आहेत, आणि कदाचित या छोट्या २-३ दौऱ्यानंतर काही सरप्राइजेस पण मिळू शकतात. २ आठवड्यांपूर्वी हा संघ जाहीर केला तेंव्हा आपले वेस्टइंडीज विरुद्धचे टी-२० सामने सुरु व्हायचे होते. त्यामुळे या संघात तसे अननुभवी खेळाडूच निवडले गेले असे म्हणायला वाव आहे हे नक्की. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात तरुण रक्ताला वाव आहे. आयपीएल सारख्या स्पर्धेतून तावून सुलाखून निघालेले खेळाडू या संघात दिसतील. रिंकू सिंग, जितेश शर्मा, तिलक वर्मा या खेळाडूंची निवड सुखावणारी आहे. हा संघ जाहीर होताना तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला नव्हता. आता त्याच्या भाळी काही सामने लागले आहेत, आणि त्यात त्याने चांगली कामगिरी देखील केली आहे. रिंकूने खास करून या वर्षीच्या आयपीएल मध्ये धमाल केली. अनेक सामने त्याने स्वबळावर जिंकले. आपली मधली फळी तशी कमजोरच असते. ती भर आता रिंकू भरून काढू शकेल. संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल सारखे सलामीची फलंदाज आहेत, तसेच संजू सॅमसन देखील या संघात असेल. या तिघांवर आपली वरची फळी अवलंबून असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर कडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवम दुबे साठी हा भारतीय संघात कमबॅक आहे. आयपीएल मध्ये चेन्नई कडून खेळताना त्यानेदेखील चांगली कामगिरी केली आहे.  एकूणच ही संघनिवड भविष्याकडे बघून केली आहे असे निश्चित म्हणता येईल. 

या मालिकेत आपल्या सगळ्यांच्या नजर असतील जसप्रीत बुमराह वर. तो देखील या मालिकेतून कमबॅक करतो आहे. गेले अनेक महिने तो दुखापतींमुळे संघाबाहेर होता. पण आता तंदुरुस्त झाल्यानंतर त्याची ही पहिलीच मालिका असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे तो या संघाचा कप्तान देखील आहे. गोलंदाज म्हणून आणि कप्तान म्हणून देखील तो कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तो पूर्णपणे फिट असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. तो देखील मॅच फिटनेस दाखवण्यासाठी आणि जबाबदारी उचलण्यासाठी उत्सुक असेल. अनेक वर्षे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण वेगवान गोलंदाजीची खिंड लढवतो आहोत. आता विश्वचषक अगदी कोपऱ्यावर आला असताना तो फिट होणे आपल्या संघासाठी खूपच महत्वाचे असेल. गोलंदाजी विभागात अजून एक खेळाडू कमबॅक करतोय तो म्हणजे प्रसिद्ध कृष्णा. प्रसिद्धने देखील भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली होती. तो देखील पुढे कसा खेळेल हे बघणे महत्वाचे ठरेल. मुकेश कुमारने वेस्टइंडीज मध्ये तीनही फॉरमॅट्स मध्ये पदार्पण केले, आणि त्याची कामगिरी देखील चांगली झाली आहे. आता वेगळ्या खेळपट्ट्यांवर आणि वेगळ्या हवामानात तो देखील काही कमाल करू शकेल ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. स्पिन बॉलिंग मध्ये लेगस्पिनर रवी बिष्णोई, ऑफब्रेक सुंदर आणि डावखुरा शाहबाझ नदीम हे त्रिकुट आहे. आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर आणि हवामानामध्ये यापैकी कोणते खेळाडू निवडले जातात आणि ते कशी कामगिरी करतात याकडे नजर असेल. 

एकूणच भविष्यातील संघ म्हणून या संघाकडे बघता येऊ शकेल. भारतीय क्रिकेट संघाला विश्रांती अशी नसतेच.  ते सदैव खेळताना दिसतात. कदाचित विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीकडे लक्ष ठेवून असतील, कदाचित काही खेळाडूंना सक्तीची रजा घ्यावी लागेल. अशावेळी हे तरुण खेळाडू कशी कामगिरी करतात हे बघणे महत्वाचे ठरेल. त्यात पुढील १० महिन्यातच (जून २०२४) टी-२० चा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याकडे बघून ही संघनिवड झाली असावी असा तर्क लावता येईल. कमी जास्त प्रमाणात हे खेळाडू आशियाई खेळांमध्ये देखील भारतासाठी खेळतील. ते देखील टी-२० सामने असणार आहेत. आता एकावेळी आपण २०-२५ खेळाडूंचा जत्था तयार ठेवण्याची वेळ आली आहे हे नक्की. हा आयर्लंडचा दौरा तसा कमी ग्लॅमरस आहे, पण या नवीन खेळाडूंसाठी निश्चित महत्वाचा आहे. आणि अर्थातच जसप्रीत बुमराह वर आपली नजर असेल. तो तंदुरुस्त असणे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे.    

To know more about Crickatha