ball

मिशन टी-२० विश्वकप २०२२

by साईनाथ सुरेश टांककर

भारतीय संघ २०२२चा आशिया कप हरला. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वकपच्या पार्श्वभूमीवर ही मोठी हार मानली जाते. आपण कर्णधार बदलला पण नशीब काही बदलले नाही. धोनीने आपल्या शांत स्वभावाने टी-२० विश्वकप, एकदिवसीय विश्वकप, चॅम्पियन्स ट्रॉपी जिंकून दिली मात्र विराट उत्तम कप्तान असूनही त्याला मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. त्यात त्याची आयपीएलची झोळीही रिकामीच. म्हणून आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला पाचारण करण्यात आले. पण आशिया कप हरल्याने नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले. आता विश्वकप जिंकता येईल का अशी शंका क्रिकेटप्रेमींच्या मनात येऊ लागली. 

मी काही तज्ञ नाही पण तरीही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लागतात असे मला वाटते. 

क्रिकेटच्या इतिहासात ज्या संघांनी मोठ्या स्पर्धा जिंकल्या त्या संघात किमान तीन अष्टपैलू खेळाडू होते. आता तुम्हीच उदाहरण पहा

2007 टी-२० – युवराज, सेहवाग, पठाण

2011 विश्वकप- सेहवाग, रैना, सचिन, युवराज

मुंबई इंडियनची ट्रॉपी- पोलार्ड, हार्दिक व कुणाल पंड्या

सध्या हार्दिक सोडला तर उत्तम अष्टपैलू नाही कारण जडेजा दुखापतीमुळे बाहेर आहे. आता बहुधा त्यात बुमराहचे नाव जोडावे लागणार. बुमराहची कमतरता भारताला खूप भासेल.

आपल्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द कमी पडते. ज्या इर्षेने श्रीलंका आशिया कप खेळली ती आपल्या संघात कमी वाटते. त्यामुळे कुठलेही मोठे नाव संघात नसताना तो संघ जिंकला. (खरं तर अपूर्ण सुविधा असूनही, देशात आणीबाणी असूनही ज्या जिद्दीने अफगाणिस्तान व श्रीलंका खेळली त्याला सलाम). क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्यामुळे जेव्हा प्रत्येक खेळाडू त्याचे योगदान देतो तेव्हा टीम जिंकते.

मोठ्या स्पर्धेत मोक्याचे क्षण काबीज नाही केले तर बाजी पलटले (१९९९ च्या विश्वकप स्पर्धेत गिब्सने किंवा २०२२ च्या आशिया कपमध्ये अर्शदिपने सोडलेला झेल किंवा २००७ & २०११च्या वेळी गंभीरची खेळी). हे क्षण भारताने गमावू नये.

फिनिशरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलिया साठी बेवन, भारतासाठी युवराज व धोनी, मुंबई इंडियन साठी पोलार्ड व पांड्या बंधूने जे केले तेच भारतासाठी सातत्याने हार्दिक किंवा कार्तिकने केले तर भारतासाठी संधी असेल. 

सध्या आपण संघात इतके बदल करतो की प्रत्येकाला त्याच्या रोलमध्ये राहता येत नाही. शिवाय भारतीय बेंच स्ट्रेंथ इतकी प्रतिभाशाली आहे त्यामुळे संघातील स्थान टिकण्याचा दबाव खेळाडूंना जाणवतो. यशस्वी संघ वारंवार बदल करत नाही आणि एखादा खेळाडू जर सर्वोत्तम खेळत नसेल तरी त्याला न बदलता बॅक करतात.

आपण स्पर्धा हरलो की जास्त चर्चा होते. त्यात सोशल मीडियाचे रान प्रत्येकाला मोकळे आहेच, ट्रोल व टीका करण्यासाठी. आपण आयपीएलला दोष देऊन मोकळे होतो. आयपीएल मध्ये खेळताना खेळाडू फिट असतो पण देशासाठी खेळताना जखमी होतो हा आपला समज आहे (जो पूर्णपणे चुकीचा आहे असेही नाही). पण मागच्या टी-२० विश्वकप स्पर्धेत काही विदेशी खेळाडूंनी चांगला खेळ केला होता आणि त्याचे श्रेय त्यांनी आयपीएलला दिले होते. म्हणजेच काय, आपल्या स्पर्धेचा अनुभव व फायदा विदेशी खेळाडूंना जास्त झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसरी गोष्ट- आपण संघ निवडताना आयपीएलची कामगिरी डोळ्यासमोर ठेवून करतो. आयपीएल मध्ये चांगले खेळणारे खेळाडू देशासाठी खेळताना ढेपळतात (काही अपवाद वगळता). त्यामुळे एक गोष्ट पक्की, देशासाठी खेळणे वेगळे आणि क्लबसाठी खेळणे वेगळे. सध्या फुटबॉल प्रमाणे क्लब संस्कृती क्रिकेटमध्ये रुजू लागली आहे हेच सत्य नाकारता येत नाही. 

सरतेशेवटी नशीब. टी-२० विश्वकप २०२१, आशिया कप या दोन्ही स्पर्धेत आपण महत्त्वाच्या सामन्यात टॉस हरलो. काही झेल क्षेत्ररक्षकाकडे गेले नाही किंवा नो बॉल वर फलंदाज बाद झाला. त्यामुळे नशीब सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे. 

शेवटी एक भारतीय क्रिकेट चाहता म्हणून एकच सांगतो- तुम्ही जिद्दीने खेळा. तुमच्या कडून १००% द्या. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. मग स्पर्धेत काहीही हो, टीममध्ये कुठलाही खेळाडू असो, एक भारतीय म्हणून आम्ही आपल्या टीमसोबत भक्कमपणे उभे राहणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

To know more about Crickatha